महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवत तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. दबावाखाली येत माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कोणाच्या दबावाखाली कोण काम करत आहे, हे शोधण्याचे काम चालू आहे, असे आता अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.
अविनाश जाधव म्हणाले की, मला अडकवण्यासाठी दबावाखाली काम केले जात असून, हा दबाव ठाण्यातून येत आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावामुळे जाधव यांच्यावर अशाप्रकारे कारवाई करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला होता.
एकनाथ शिंदेवर निशाणा साधत जाधव म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी एवढे भ्रष्टाचार केले आहेत की, ते उघडे करण्याची वेळ आले आहे. प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो. हा त्यांचा शेवटचा होता. आता त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी रोज समोर आणणार आहे. मागील 6 वर्षात ते मंत्री असताना त्या त्या खात्यांमध्ये काय प्रस्ताव आले, त्याचे काय झाले यावर आम्ही काम करणार आहोत.
मला अडकवण्याची यांची लायकी नसून, ते केवळ त्रास देऊ शकतात. आज मला त्रास होतोय, उद्या तुम्हाला होणार. कायम मंत्री राहण्याचे अमरत्व घेऊन आलेला नाहीत. एक दिवशी तुम्ही जाणार, त्या दिवशी घरातून उचलून नेणार, असा इशारच यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना दिला.