पुणे – ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे हे ‘अंडरग्राउंड’ झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत ज्या युवकांनी आणि तरुण वर्गाने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना डोक्यावर घेतले. त्यांना अक्षरश: घोड्यावर बसवले. त्याच युवकांना अवघ्या दीड वर्षात कोल्हेंनी वाऱ्यावर सोडले का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये युवक- तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. अनेकांनी निवडणुकीत बाजीही मारली आहे. शिरुर, जुन्नर, आंबेगाव, खेड, हवेली आदी तालुक्यांमधील बहुसंख्य ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या संबंधित पॅनेलचे वर्चस्व दिसते.
ग्रामपंचायत निवडणूक हा ग्रामीण राजकारणाचा कणा आहे, असे म्हटले जाते. महाविकास आघाडीचा उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रभावी चेहरा म्हणून डॉ. कोल्हे यांना काम करता आला असते. मात्र, कोल्हे चित्रिकरणात व्यस्त होते. निवडणूक निकाल आल्यानंतर मात्र कोल्हेंनी मतदारांचे आभार मानले. पण, कोल्हेंसाठी विरोधकांना अंगावर घेणाऱ्या तरुण उमेदवारांचा साधा प्रचारसुद्धा केला नाही. ना कुठल्या गावात हजेरी लावली. ना कोणत्या कार्यकर्त्याला मतदान करा, असे आवाहन केले.
मात्र,अमोल कोल्हे यांचे कट्टर विरोधक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मात्र ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये सक्रीय दिसले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार अतुल बेनके, अशोक पवार, दिलीप मोहिते-पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार केला. पण, डॉ. कोल्हे यांनी मात्र निवडणुकीकडे दुर्लक्ष केले आहे. आगामी काळात डॉ. कोल्हे यांचे आत्मकेंद्री राजकारण त्यांच्या स्वत: साठी आणि राष्ट्रवादीसाठी सुद्धा त्रासदायक ठरणार आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान यापैकी अनेकांनी डॉ. कोल्हेंना साथ देण्यासाठी तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा थेट विरोध पत्कारला. विशेष म्हणजे, शिरुर मतदार संघातील त्यावेळी सहापैकी पाच आमदार भाजपा आणि सेनेचे होते. तरीही तरुणांनी मोठ्या आशेने कोल्हेंसोबत प्रचार केला. मात्र, अवघ्या दीड वर्षातच कोल्हे युवक- तरुणांना विसरले.