पुणे – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देशातील मोदी सरकारमधील नेत्यांना 25 वर्षाच्या एखाद्या नेत्याची भीती असते, अगदी तशीच भीती 80 वर्षांच्या शरद पवार यांची आहे, असं वक्तव्य केलं आहे. “होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याच होतं हे आपण ऐकतो, ते शरद पवार साहेबांनी सत्यात उतरवून दाखवलं,” असं धनंजय मुंडे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने भाजप बदनाम करत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. खाल्लेल्या अन्नाला तरी जागा, असं आव्हान मुंडे यांनी दिलं. शेतकरी जगाला तर आपण जगू म्हणून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, आणि शेती करत नसला तरीही पाठिंबा द्यावा , असं आवाहन धनजंय मुंडे यांनी केले.
शिरुर लोकसभा मतदारसंघात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचं उद्घाटन करण्यात आले. हा धागा पकडत धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सत्ता देणाऱ्या जनतेचं म्हणणं ज्यांना श्रवणातून ऐकू येत नसेल त्यांना श्रवणाखाली द्यायला हवी? कारण, त्याची मशीन अद्याप निर्माण झालेली नाही, अशा वेळी हाताचा वापर करावा लागतो, असा टोला मुंडे यांनी लगावला.