मुंबई :९ ऑक्टोबरला १२:३० होणाऱ्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार असून, या निमित्ताने पहिल्यांदाच राणेंच्या अटक ‘कार्यक्रमा’नंतर ठाकरे आणि राणे आमने-सामने येणार आहेत. मात्र, त्याआधीच राणेंनी, ‘या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हवेत कशाला?’ असा सवाल करत वातावरण तापवलं.
त्यानंतर आता तीनच दिवसांत या वक्तव्यावरून राणेंनी नरमाईचा सूर आळवला असून, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर स्वागतच करू. आम्ही त्यांना प्रोटोकॉलनुसार मान देऊ,’ असं म्हणत, ‘हे विमानतळ मी स्वत: बांधलं असून, ते मी मंत्री असतानाच्या कार्यकाळात पूर्ण झालं आहे. त्यामुळे श्रेय कसलं? जे याबाबदल बोलत आहेत, त्यांचं यात १ टक्क्याचं श्रेय नाही,’ अशी टीका त्यांनी सुभाष देसाईंवर केली आहे.
यावेळी, ‘मी स्थानिक नाही का? नितेश आणि निलेश राणे स्थानिक नाहीत का? त्यामुळे, उद्घाटन करण्याचा आमचाही अधिकार आहे. श्रेय लाटण्याचा प्रयत्न उगाच करू नये. आम्ही मंत्र्याशी रितसर बोललो आहोत आणि वेळही घेतली आहे. शिवसेना नेते कोणत्या आधारावर बोलतात? मला माहीत नाही,’ असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, ‘मुख्यमंत्र्यांना बोलवायचं की नाही, याचा अधिकार राणेंना कुणी दिला?, असा सवाल नीनायक राऊत यांनी केला होता.
तसेच, “मुख्यमंत्र्यांनी यासाठी ४ बैठका घेतल्या, ४ हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत ७ वर्षात वेळोवेळी बैठका घेतल्या. हे विमानतळ राज्याच्या MIDC अधिकार क्षेत्रात येते. केंद्र सरकार फक्त लायसन्स देण्याचं काम करते. त्यामुळे, राणेंना याचे श्रेय घेता येणार नाही. त्यांनी फुशारकी मारताना भान ठेवावं, इतकी वर्षे राणे कोठे होते? असा सवालही त्यांनी केला होता. भाजप नेत्यांनी देखील मुख्यमंत्री यावेत अशी भूमिका जाहीर केली होती.