मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला आणखी चार मंत्रिपद आले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे कपिल पाटील भारती पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आज ४३ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यात ११ महिलांना संधी देण्यात आली आहे. तसेच राजकीय वर्तुळात मुंडे भगिनीवर अन्याय झाल्याची चर्चेला उधान आले आहे.
गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असणारे भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. त्याचवेळी मराठवाडय़ातील राजकारणातील नेत्या पंकजा आणि प्रितम मुंडे या भगीनींचे पंक छाटण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. महाराष्ट्रात भाजपच्या वाढीसाठी गोपीनाथ मुंड यांनी दिलेल योगदान लक्षात घेता खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात यांना स्थान मिळेल अशी अटकळ होती. त्यासाठी त्या दिल्लीत गेल्याची चर्चाही होती. अखेर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करत याच खंडन करत प्रीतम मुंडे मुंबइतील निवासस्थानी असल्याचे स्पष्ट केल.
आयारामांना मंत्रीपद, निष्ठावंतांना धत्तुरा!
पक्ष वाढविण्यासाठी वाटेल ते! अशा पद्धतीने केंद्रातील सत्ताधारी भाजपचा कारभार चालू आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, संजय धोत्रे यांच्यासारख्या भाजपच्या निष्ठावंतांना डच्चू देत घरी बसवले. त्याचवेळी महाराष्ट्रातून पक्षाबाहेरून आलेले नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार तर मध्य प्रदेशमधून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घातली.
कोण कुठून आले भाजपात
नारायण राणे – शिवसेनेने नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री केले. पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपुरे राहिलेल्या राणे यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण त्यांना मंत्रीपद देण्यात आलं. कॉँग्रेस नेतृत्वावर टीका करत पक्षातून बाहेर पडल्यावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. अल्पावधीच हा पक्ष गुंडाळून राज्यसभेची उमेदवारी मिळवत २०१९ मध्ये नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कपिल पाटील – भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय करकिर्दीला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भिवंडी लोकसभा मतदार संघातून २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाले.
भारती पवार – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले माजी आमदार ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या देवळा गटातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा असणाऱया भारती पवार यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि दिंडोरी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.