सोलापुर : सत्ता येते पण ती लोकांसाठी वापरायची असते. त्या सत्तेकडे जमिनीवर पाय ठेवून बघायचे असते. सत्ता एकदा डोक्यात शिरली, की ते पायसुद्धा जागेवर राहत नाही. डोक्यात शिरलेली सत्ता चुकीचा रस्ता दाखवल्यानंतर सत्तेवर बसवणारा जो घटक आहे, सामान्य नागरिक, तो सहन करतो. पण त्याच्या सहन करण्याला मर्यादा असते. ज्यादिवशी त्या मर्यादेचे उल्लंघन होते, त्यावेळी ज्यांच्या डोक्यात सत्ता शिरलीये, त्यांना योग्य जागा दाखवण्याचे काम सामान्य माणूस करतो. त्यामुळे याठिकाणी जे दुखणे मांडले गेले त्याची नोंद आपण घेऊया आणि दृष्टीने लोकांची सुटका कशी होईल याची काळजी घेऊया. असं म्हणत शरद पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रचार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“अमोल किर्तीकरांशी लढताना ‘गजानन किर्तीकर’ वायकरांची साथ देतील की पोटच्या पोराची ?
शरद पवार म्हणाले की, सत्ता असो वा नसो, लोकांना यातना द्यायचे काम कोणीही करत असेल आणि ते कोणत्याही पदावर करत असतील, तर अशांना ऐकत असल्यास योग्य प्रकारचे मार्गदर्शन आणि ऐकत नसतील तर योग्य प्रकारचा धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. तुम्ही फलटणकर एकटे नाहीत तर आम्ही बारामतीकर तुमच्या पाठीशी अखंडपणे राहू. फलटणी विकासाची कामे, राजकीय कामे, किंवा अन्य कामांना आमची मदत तुमच्यासाठी आहे. गेले काही वर्षे आपण एकत्र काम करतोय. माझ्याकडे राज्याची जबाबदारी आल्यानंतर हा कारभार चालवताना आजूबाजूच्या सहकाऱ्यांचं सहकार्य लागत होते. सोलापूरमधून विजयदादा, साताऱ्यातून रामराजेंची साथ होती. त्यांचे वैशिष्ट्य होते, की मूलभूत प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्या प्रश्नांची सोडवणूक करायची. यासाठी रामराजे असो, संजयराजे असो त्या सगळ्यांनी प्रयत्न केले, त्यामुळे या भागाचा चेहरा बदलण्याची स्थिती झाली.
हेही वाचा….“अजितदादा विकासकामे खेचून आणतील, त्यासाठी सुनेत्रा पवारांना खासदार करा”
देशाचे प्रधानमंत्री आज साताऱ्यात येऊन गेले. अपेक्षा होती की राज्याचे नेतृत्व ज्यांनी केले आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत आयुष्याचा काळ ज्यांनी दिला, देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर आपले कर्तृत्व दाखवण्याचे काम ज्या महान नेत्याने केले, त्यांच्याप्रती प्रधानमंत्री समाधीचे दर्शन घेतील किंवा देशासाठी योगदान देणाऱ्यांचा आदरयुक्त उल्लेख करतील. पण या दोन्ही गोष्टी घडल्या नाहीत. राज्य हे लोकांसाठी चालवायचे असते, ते कशा पद्धतीने चालवायचे याचा विचार नेतृत्वाने करायचा असतो. तो याठिकाणी केला गेला नाही. यशवंतरावांचे नाव प्रधानमंत्र्यांनी घेतले नाही, यातून चव्हाण साहेबांची अप्रतिष्ठा होत नाही. तर अशा महामानवाकडे दुर्लक्ष जी व्यक्ती करते तिच्यासंबंधी चर्चा अनुकूल होऊ शकते. असेही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, स्वातंत्र्यानंतर फलटण राज्य हे संपूर्ण निंबाळकर कुटुंबियांच्या हातात होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामान्य लोकांचा अधिकार महत्त्वाचा आहे, हा दृष्टीकोन मान्य केला आणि संस्थानाची साधनसंपत्ती, संस्थानाचा अधिकार हा सरकारला देऊन टाकला. हा फलटणचा इतिहास आहे. हा इतिहास नजरेसमोर ठेवून लोकशाहीवर संविधानावर गदा आणण्याचे काम जे करू पाहात आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आपल्याला करावे लागेल. त्यासाठी ही निवडणुक अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी धैर्यशीलला निवडणुकीत उभे केले आहे. त्यांचा एक विजय इतरांना प्रेरणा देईल. या सगळ्याची सामुहिक शक्ती ही संसदेत गेली, तर या देशाच्या घटनेला कोणीही हात लावू शकणार नाही. एवढी ताकद या तरूणामध्ये आहे, त्यांना प्रोत्साहन द्या. असे आवाहन देखील शरद पवारांनी केलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“आज भारत जगाला मदत करतो, कुणाकडून भीक मागत नाही”, मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
हेही वाचा…“शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा, हे मोदीला ४ जुनला कळून येईल,” शरद पवार गटाचा मोदींवर पलटवार