नवी दिल्ली : देशासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दवाखान्यात कोरोना पेशंटची कोरोना पेशंट ची लूट सुरू आहे. देशात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात, वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा आहे. महाराष्ट्र सरकार सातत्याने कोरोनवर रोक लावण्यावर अयशस्वी राहिल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांनी याबाबत मागणी केली.
नवनीत राणा म्हणाल्या की, केंद्र सरकारने यात लक्ष घालावे. महाराष्ट्राला पंतप्रधान केअर फंडातून भरीव मदत करावी व खाजगी दवाखान्यात होणारी लूट थांबविण्यासाठी केंद्र सरकारने विशेष भरारी पथक पाठवावे. रुग्णांची लूट करणाऱ्या खाजगी दवाखाना संचालकांना लगाम घालावा.
नवनीत राणा म्हणाल्या की, खाजगी दवाखाने 2 ते 12 लाख रुपयांपर्यंत बिल आकारून रुग्णांची सरळ लूट करीत आहेत. या मुळे गरीब रुग्णांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यांना उपचार घेणे परवडत नाही म्हणून बिचारे घरीच तडफडून मृत्यूला कवटाळत आहेत. महाराष्ट्र सरकार मध्ये कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही त्यामूळे अनागोंदी माजली आहे. रुग्णालयात बेडची कमतरता आहे, ऑक्सिजन सिलेंडर नाहीत, औषधी तुटवडा आहे, अँबुलेन्स, व्हेंटिलेटर, मास्क, सॅनिटीझर आदींचा तुटवडा आहे.
नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेत मागणी केली की, या अडचणीतून लोकांची सुटका करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 20000 रुग्ण क्षमतेचे विशेष कोविड उपचार सेन्टर तयार करावे व संपूर्ण उपचार मोफत करावा. सद्यस्थिती मध्ये महाराष्ट्र सरकार या परिस्थितीला हाताळण्यात संपूर्णपणे अपयशी ठरले आहे त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्राने आपल्या मार्फत यंत्रणा संचालन करावे.