मुंबई – संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या कोरोनाने देशाला घातलेल्या विळख्याला सर्वच स्तरावरून मोदी सरकारला जबाबदार धरले जात आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर केली आहे.(nawab malik attack central government over corona pandemic)
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भाजपशासित उत्तरप्रदेश आणि बिहार हे कोरोना मॅनेजमेंट जाहिरातीमध्ये व्यस्त आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च करण्यात येत आहेत. तेवढा पैसा कोरोनावर खर्च केला असता तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.
कोरोना रोखणं हे एकट्या मोदींचं काम नाही, हे मी आधीपासून बोलत आहे. सर्वपक्षीय बैठक बोलवून घ्या. जर सर्वजण कामाला लागले तर आठ महिन्यात कोरोनावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. आता ज्या पद्धतीने काम सुरू आहे. विशेषत: भाजप शासित राज्यात ते पाहता येत्या दोन चार वर्षात तरी कोरोना संपणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
केंद्र सरकारकडून कोविड कंट्रोल होत नाही याबाबत कुणाच्याही मनात ही शंका राहिली नाही. सुप्रीम कोर्टाने टास्क फोर्ससाठी निर्णय घेतला आहे, जी कामं सरकारला करायला हवी ती सुप्रीमी कोर्ट करत आहे, याचा अर्थच आहे की मोदी जबाबदारी पार पाडण्यात असमर्थ आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.