मुंबई: शरद पवार यांनी काल (११जुलै) भाष्य केल्यानंतर ‘चोर के दाढीमे तिनका’ असं वक्तव्य भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार यांनी केलं. मात्र, ‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नांव काय हे आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. ते मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
विशेष म्हणजे यापुढे दर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे. आज या पत्रकार परिषदेची सुरूवात झाली. पहिल्याच पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी भाजपला निशाण्यावर घेत जोरदार फटकेबाजी केली. योगी आदित्यनाथ यांची ‘दोन मुलांची’ पॉलिसी असेल किंवा अमित शहा यांच्या सहकार खात्याबद्दल भाजपकडून देण्यात येत असलेल्या धमक्या असतील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही नवाब मलिक यांनी भाष्य करत सबुरीचा सल्ला दिला.
नवाब मलिक म्हणाले, “शरद पवार यांनी २०१३ साली युपीए सरकारच्या काळात सहकाराला घटनात्मक सुचित टाकून स्वायत्तता देण्याचे काम केले. परंतु या स्वायत्ततेवर कोण गदा आणत असेल, तर त्यावर नंतर बोलू. मात्र कायद्याचं राज्य असतं. कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. एखादा व्यक्ती मंत्री झाला म्हणून सर्व अधिकार मिळतात असं नाही. त्यामुळे भाजपच्या लोकांनी जबाबदारीने बोलावं.”
“नाना पटोले यांनी माहितीच्या अभावी आरोप केला…”
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहितीच्या अभावी आरोप केला आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.
नवाब मलिक म्हणाले, “नाना पटोले यांनी त्यांच्या हालचालीवर व कार्यक्रमावर पहारे बसवण्यात आले आहेत. ही माहिती गृहमंत्रालय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पुरवते असा आरोप केला. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी राज्यात सरकार कुणाचेही असो राजकीय कार्यक्रम, आंदोलने, बैठका किंवा महत्त्वाचे नेते, मंत्री त्यांच्या हालचालीची नोंद ठेवण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक असतं. ते सर्व पक्षांची माहिती संकलित करून तो खात्यांतर्गत रिपोर्ट करत असतात आणि संकलित माहिती गृहखात्याकडे जमा होते.”
“ही सिस्टम नाना पटोले यांना माहीत नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चौहान यांच्याकडून माहिती करून घेतली पाहिजे. जर नाना पटोले यांना वाटत असेल की, त्यांच्या कार्यक्रमाला पोलीस नको, त्यांच्या नेत्यांना, मंत्र्यांना पोलीस बंदोबस्त नको तर तसा अर्ज केला तर त्याबाबतीत गृहमंत्री काय तो निर्णय घेतील,” असेही नवाब मलिक म्हणाले.