राष्ट्रवादी काँग्रेसची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सगळे मंत्री, नेते आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांचं प्लॅनिंग ते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कामगिरी यावर चर्चा झाली. यानंतर प्रसारमाध्यांशी साधलेल्या संवादात मलिक यांनी बैठकीचा तपशील सांगितला.
“शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यभरात पक्षवाढीसाठी काय कार्यक्रम घ्यायचा, संघटना मजबूत कशी करायची यावर चर्चा झाली. पालकमंत्री, मंत्री यांच्या नेतृत्त्वात काय कामं झाली, याचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी आणखी कशी मजबूत होईल यावर चर्चा झाली.”
“ग्रामपंचायती निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. स्थानिक आघाड्या होतात. त्याबाबत चर्चा झालेली नाही. महापालिका निवडणुका आहेत, विशेषत: औरंगाबाद, मिरा भाईंदर, नवी मुंबई, जिल्हा परिषद भंडारा, गोंदिया याची तयारी कशी करायची याबाबत चर्चा झाली. पुढच्या काही दिवसात कार्यक्रम ठरेल, त्यानुसार नेत्यांना जबाबदारी दिली जाईल.
मुंबई महापालिका किंवा महाराष्ट्राबाबत पवारासाहेबांची स्पष्ट भूमिका आहे. आघाडी असताना तिन्ही पक्षांनी एकत्रच निवडणुका लढायला हव्या. मुख्यमंत्र्यांनीही त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका तिन्ही पक्षांनी एकत्र लढावी अशी त्यांची भूमिका आहे. आता काँग्रेस नेते बोलत राहात आहेत, पण त्याबाबत अधिकृत चर्चा सुरु झालेली नाही. आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला हवं, पण काँग्रेसची भूमिका ते ठरवतील. पण आमची भूमिका स्पष्ट आहे.
Read Also
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारचा आरोप; चौकशीस हजर राहण्याचे आदेश