राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू आणि पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांना फटकारल्यामुळे राज्यात राजकीय चर्चा सुरू होती. शरद पवार यांनी केलेल्या या विधानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल जयंत पाटलांच्या समवेत शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे भेटीसाठी गेले होते. या बैठकीत पार्थ पवारांबाबत चर्चा होणार असे तर्क वितर्क चालू होते
तसेच या बैठीकीनंतर जाईनात पाटील यांनी खुलासा करत पवार कुटुंबामध्ये कोणतेही वाद नसून अजित पवार नाराज नाहीत असे स्पष्टीकरण दिले तसेच शरद पवार हे कुटुंब प्रमुख असून त्यांना सूचना करण्याचा अधिकार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या या बैठकीमागचा हेतू हा फक्त पार्थ पवार यांच्याबद्दल नसून हि एक राजकीय बैठक असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी राज्यात एक मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राष्ट्रवादीतील गयारामांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची जबाबदारी शरद पवारांकडून अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. लवकरच राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांच्या प्रवेश करून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदारांना पुन्हा पक्षात घेताना राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेतलं जाईल, असंही बोललं जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमूक पक्षाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा सगळ्याच पक्षाकडून दावा होत आहे. काही दिवसाआधीच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर असल्याचं म्हटलं होतं. त्यातच आता राष्ट्रवादीचे घरवापसी अभियान सुरु होणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आता भाजपला डॅमेज कण्ट्रोलसाठी प्रयत्न करावे लागणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.