नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला तरी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. पवार यावेळी यूपीएच्या अध्यक्षपदाचीही मोर्चेबांधणी करणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला असल्याने पवारांच्या या दिल्लीवारीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. या महिन्याभरात शेतकरी नेते आणि केंद्र सरकारच्या अनेक बैठकाही झाल्या. मात्र, त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रपतींना भेटून निवेदनं दिल्यानंतरही शेतकरी आंदोलन सुरूच आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच कृषी कायद्याचं समर्थन करत विरोधकांनी भ्रमित केल्यामुळेच शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा सुटण्याची शक्यता धुसर झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना एकत्र करण्यासाठी पवार दिल्लीत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व विरोधकांना एकत्र करून सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत पवार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी पवारांनी सर्व विरोधी पक्षांची उद्या दिल्लीत बैठक बोलावल्याचंही सूत्रांनी सांगितलं. या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपा सुप्रिमो मायावती उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.