पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत राहिली होती. या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला जोरदार दणका दिला. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा जवळपास 4 हजार मतांनी विजय झाला आहे. मात्र, आता राष्ट्रवादी कँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत ही निवडणुकच परत घेण्याची मागणी केली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत साम-दाम-दंड-भेद वापर करण्यात आला. त्यामुळे याची योग्य ती चौकशी करुन फेरनिवडणूक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलने केली आहे.
प्रशांत परिचारक आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या कारखान्यावर कार्यरत असणारे सर्व सभासद, कर्मचारी यांना निवडणुकीपूर्वी तीन दिवस डांबून ठेवले होते. तसेच त्यांना धमकी देऊन भाजपला मतदान करा, अन्यथा कामावरुन काढून टाकू, असेही सांगण्यात आले. त्यामुळे धमक्या देण्याचा संशय निर्माण होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लीगल सेलचे अॅड. नितीन माने यांनी याबाबतची मागणी केली आहे.
निवडणूक परत घेण्याची मागणी करत मुख्य निवडणूक आयोगासह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, सोलापूर जिल्हाधिकारी, पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र पाठवण्यात आले आहे.