मुंबई – राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. या निवडणुकीत पूर्णपणे जोर लावण्यासाठी पक्षातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसोबत राष्ट्रवादीने चर्चा सुरू केली आहे. या पराभूत उमेदवारांना बळ देण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमदेवारांनाच या बैठकीला बोलावण्यात आले आहे. यावेळी या उमदेवारांना मिळालेली मतं, त्यांचं मतदारसंघातील प्राबल्य, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागातील पक्षाची स्थिती, या उमेदवारांच्या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये या उमेदवारांची भूमिका काय असेल? याची चर्चाही या बैठकीत करण्यात येणार असून त्यानुषंगाने जबाबदाऱ्यांचं वाटपही करण्यात येणार आहे.
तसेच या पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघांमध्ये कोरोना काळात झालेली कामे, राज्य सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि ही कामे मतदारसंघापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्यावरही या बैठकीत भर देण्यात येणार आहे. तसेच नाराजांचं म्हणणंही ऐकून घेण्यात येणार असल्यांच सूत्रांनी सांगितलं.