मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यावर चिंता व्यक्त केली. एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आता सावरला आहे. त्या पंजाबला पुन्हा अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक करू नका, असं आवाहन शरद पवार यांनी केंद्र सरकारला केलं.
शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून केंद्र सरकारला कानपिचक्या दिल्या. अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. टोकाची भूमिका घेऊ नये. शेतकऱ्यांच्या रास्त प्रश्नांसंबंधित अनुकूल निर्णय घ्या, असं सांगतानाच बळाचा वापर करून निर्णय घेणं योग्य नाही. तशी मानसिकताही ठेवू नका. एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आपण पाहिला आहे. तो सावरलेला आहे. पुन्हा पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक मोदी सरकारने करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
मी यापूर्वीही शेतकऱ्यांचे मोर्चे पाहिले आहेत. अगदी मोर्च्यांवर गोळीबार झालेलाही पाहिला आहे. पण फक्त शेतकरी वर्गालाच टार्गेट करण्याचा प्रकार पहिल्यांदाच झाला आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवणं, त्यांना पाकिस्तानी संबोधणं, त्यांच्या झेंड्यावरून वक्तव्य करणं हा आततायीपणा आहे, असं सांगतानाच देशाच्या प्रमुखाने शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. दिल्लीतच शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. चर्चा करायला हरकत नव्हती, असंही ते म्हणाले.
गेल्या 60 दिवसांपासून पंजाब-हरयाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीत बसून त्यांचं म्हणणं मांडत आहेत. शेतकऱ्यांनी 60 दिवस संयम दाखवला ही अभूतपूर्व गोष्ट आहे. इतक्या संयमाने भूमिका गेणारे शेतकरी असताना केंद्राने सकारात्मक पुढाकार घेऊन मार्ग काढायला हवा होता, असं त्यांनी सांगितलं. इतके दिवस संयमाने आंदोलन केल्यानंतर वेगळ्या मार्गाने म्हणणं मांडण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला असावा. इतक्या दिवसानंतर संयमाने आंदोलन करणारे लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा सरकारने त्याकडे समंजसपणे पाहायला हवे होते.
त्यांच्या रॅलीला येण्याजाण्यासाठी परवानगी द्यायला हवी होती. त्यांचे मार्ग आखून द्यायला हवे होते. 25 हजार ट्रॅक्टर रस्त्यावर उतरल्यावर काय परिस्थिती होईल याचा अंदाज त्यांना यायला हवा होता. पण पोलिसांनी जाचक अटी लादल्याने प्रतिकार झाला. वातावरण चिघळलं, असं सांगातनाच जे घडलं त्याचं समर्थन करता येणार नाही. पण ते का घडलंय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असंही ते म्हणाले.
Read Also
शेतकरी आंदोलन चिघळले! कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण
8 वर्षांपेक्षा जुन्या वाहनाचा भरावा लागणार ‘ग्रीन टॅक्स’, गडकरींची प्रस्तावाला मंजूरी