भाजप आमदार सुनील राणे यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी बोरिवली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजप अध्यक्ष मंगलप्रात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार नितेश राणे, आमदार योगेश सागर आणि भाजपचे अन्य नेते उपस्थितीत होते. यावेळी नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून आई आणि मुलाचे सरकार हटवले. त्याचप्रमाणे आपल्याला मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचे आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. नितेश यांनी आदित्य ठाकरे यांना बेबी पेंग्विन संबोधत त्यांची खिल्ली उडविली. तसेच मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारावरही टीका केली.
कोरोनाच्या काळात मुंबई महानगरपालिकेने केवळ मोठमोठी टेंडर मंजूर केली. प्रत्यक्षात मात्र काहीच घडले नाही. उद्धव ठाकरे आपण लोकप्रियतेच्याबाबतीत देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री असल्याचा दावा करत होते. पण कोरोनाच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. अगदी दाऊदची धमकी आली तरी ते घरातच बसून राहिले, अशा शब्दांत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडविली.