मुंबई : राज्यातील नेत्यांना नोटीस बजावण्याचा ईडीने धडाकाच लावला आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, महाविकास आघाडीतील नेते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस बजावण्यात आल्या संदर्भात विचारले असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी, ईडीच्या कामकाजात केंद्राचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे.
ईडीच्या कामकाजात केंद्राचा हस्तक्षेप असल्याचं दिसून येतंय, पण आता ईडीला कुणीही भीत नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
पवार साहेबांना नोटीस पाठविण्यात आली होती, पुढे काय झालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही ईडीची नोटीस पाठवली होती, पण पुढे काय झाले? नेत्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे केले जात असल्याचे, मलिक म्हणाले.