पंढरपूर : महाराष्ट्रात सध्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या मतदारसंघासाठीचे विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान १७ एप्रिल रोजी पार पडणार असून, या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे.
त्याआधी राज्यातल्या प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी, पंढरपुरात आपल्या प्रचारसभांनी निवडणुकीच्या मैदानात धुरळा उडवून दिला असून, पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अशा दिग्ग्ज नेत्यांच्या प्रचारसभांनातर, आज पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली असून, ठाकरे सरकारकडे काहीच नियोजन नाही, तयारी नाही. सरकारमध्ये इच्छा शक्ती कमी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही. आता तर महाविकास आघाडी सरकार पडेल, हे आठवीतील मुलगाही सांगू शकेल, असे भाकीत करत ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. तसेच, विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत, असे देखील पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केल्यानंतर, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केल्याने सातत्याने हे सरकार लवकरच पडणार असल्याच्या चर्चांना पीक आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.