काँग्रेसशी संलग्न असलेल्या एका संस्थेची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. भाजप आणि त्यांच्या सरकारकडून आणखी काय अपेक्षा केल्या जाणार ? काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी सरकारला इंधन दरवाढ, कोरोनाची स्थिती हाताळण्यास अपयश आणि चीन सीमावादावरून वारंवार केंद्र सरकारला प्रश्न विचारत असल्याने मोदी सरकार ईडीचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
थोरात म्हणाले की, राहुल गांधी हे वारंवार चीनची घुसखोरी व 20 जवानांच्या बलिदानावरून केंद्र सरकारला सातत्याने प्रश्न विचारत आहेत. कोरोना संकटावर सरकारने त्वरित पावले उचलावीत असेही सल्ला राहुल गांधी यांनी सरकारला सांगितले होते. मात्र या सरकारला विरोधकांनी प्रश्न विचारलेले चालत नाहीत. या सरकारचा लोकशाहीवर विश्वासच नाही. काँग्रेस भाजपच्या दबाव टाकण्याच्या तंत्राना घाबरणार नाही व काँग्रेस नेते देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्यांवर आवाज उठवत राहतील.
याशिवाय थोरात यांनी बाबासाहेब आबेंडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर करण्यात आलेल्या तोडफोडीचा निषेध नोंदवला व हल्लेखोरांना त्वरित अटक करून कारवाई करावी असे म्हटले आहे.