मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “आपण कोरोना मृत्यूदर आटोक्यात आणू” असं ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही खुदा होऊ नका, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. लॉकडाऊन वाढवू नका, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी केली. भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे कोरोनाने नाही, पण रोजगार बुडाल्यामुळे उपासमारीने माणसं मरतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
“उद्धव ठाकरे, विनंती… खुदा होऊ नका. कोरोना व्हायरसने भीती सगळ्यांना घातली. मीही त्यावेळेस भ्यायलो होतो. 40 टक्के लोक बाधित होतील, असं अमेरिकेच्या हॉपकिन युनिव्हर्सिटीने सांगितलं. पण त्याच्याच आठवड्याभरानंतर ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी सांगितलं की भारतात कोरोना व्हायरस पसरु शकणार नाही. त्यांची रोगप्रतिकार शक्ती फार चांगली आहे. ओस्ट्रेलिया जिंकत आहे, असं दिसतंय” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“कोरोना मृत्यूदर आज दोन टक्के किंवा त्याच्या थोडा वर असताना दिसत आहे. बुद्धांनी एक गोष्ट सांगितली आहे, की माणसं जन्माला आली, की त्यांचं मरण निश्चित. त्यामुळे आता आपल्याला विनंती आहे की देशाची अर्थव्यवस्था आपण आता सुधारण्याच्या पाठीमागे लागावे. तरच माणसं जगतील, नाहीतर उपासमारीने माणसं मरतील अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे, लॉकडाऊन आपण वाढवू नका” अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.