प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूर येथील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या बांधावरच जाताना गावात जाऊनही घरांची पाहणी केली. तसेच शासनाकडून आलेल्या मदतीचीही विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला. “अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे कर्जाची मागणी केली आहे का? त्याचा राज्य सरकारने खुलासा करावा. जर केंद्राकडे कर्जाची मागणी केली असेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे कर्ज मंजूर करून घेतले पाहिजे”, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडूनच कर्ज काढू शकते. इतर कुणाकडून कर्ज घेऊ शकत नाही. त्यामुळे राज्याने केंद्राकडे कर्जाची मागणी केलीय का? याचा आधी खुलासा केला पाहिजे. जर कर्जाची मागणी केली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जोर लावून हे कर्ज मंजूर करून घेतलं पाहिजे, असं आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज सोलापूर दौऱ्यावर आले. अक्कलकोट मधील सांखवी या गावाला त्यांनी भेट दिली. परतीच्या पावसामुळे सोलापुरातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी स्तरावर मंत्र्यांचे दौरे सुरू असून मदत मात्र कोणत्याही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, काहीना मदतीच्या नावावर चार हजार रुपयांचे धनादेश देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आज या सर्वांनी बाळासाहेबांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.