सांगली : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ईडीने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षाच्या लोकांवर, आमदारांवर कारवाई करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक चालू आहे, असं जनतेच मत होऊ लागले आहे. असे जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. तसेच, सरनाईक यांनी राजकीय फायदा घेऊन काम केलेले कुठे दिसत नाही, असे म्हणत प्रताप सरनाईक यांची त्यांनी पाठराखण केली.
प्रताप सरनाईक यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. ठाणे शहरात व्यवसाय करुन ते मोठे झाले आहेत. त्यांनी कोणताही राजकीय फायदा घेऊन काम केलेले दिसत नाही. तरीही सरनाईक यांच्यावर कारवाई झाली, असे, जयंत पाटील म्हणाले. तसेच, “सत्य लवकरच बाहेर येईल आणि जनतेच्या खरं काय ते लक्षात येईल, असेही पाटील म्हणाले.
किरीट सोमय्या यांची टीका
प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ईडीने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले. ‘ईडी’च्या कारवाईतून कोणीही वाचणार नाही. फक्त प्रताप सरनाईकच नव्हे तर ठाकरे सरकारने वाचवलेल्या प्रत्येकावर कारवाई होईल, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
‘ईडी’च्या सगळ्या तपासातून कोणीही सुटणार नाही. या व्यवहारातून ज्यांना फायदा झाला आहे, त्या सर्वांवर कारवाई होईल. आज ना उद्या सर्व गोष्टी समोर येतीलच. मात्र, ठाकरे सरकार या सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ईडीसमोर हजर राहा, असा आदेश प्रताप सरनाईक यांना देण्यात आला आहे. मुंबईबाहेरुन आल्यामुळे सरनाईकांनी विलगीकरणात असल्याचं कारण सांगत ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली होती. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक कुटुंब ईडीच्या रडारवर आहे.
Read Also :
शेतकऱ्यांच्या ‘चलो दिल्ली’ मार्चनं दिल्लीच्या सीमांना छावणीचं स्वरुप
पंतप्रधान मोदींना पुण्यात अडवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतला मोठा निर्णय
‘पाच वर्ष आंब्याच्या झाडाखाली बसून आंबे खाणाऱ्यांवर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ’