इचलकरंजी: दिल्लीतील कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे. कृषी कायद्याला विरोध केल्याने भाजपकडून राजू शेट्टींवर सडकून टीका केली जात आहे.
राजू शेट्टी आता शेतकरी नेते राहिले नसून, केवळ केवळ विधानपरिषदेतील आमदारकी हेच आता त्यांचे लक्ष्य असल्याची, जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
इचलकरंजीत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राजू शेट्टी हे पूर्वी शेतकरी नेते म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता त्यांना राजकारणात जास्त रस आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांची शेतकरी नेते ही ओळख पुसली गेली आहे.
राजू शेट्टी हे अजूनही स्वत:ला शेतकरी नेते समजतात. हे खूळ त्यांच्या डोक्यात आहे. शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्यामुळे त्याची डागडुजी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. शेट्टी यांचे लक्ष्य आता केवळ विधानपरिषदेतील आमदारकी असल्याची घणाघाती टीका, दरेकरांनी केली आहे.