पुणे : महायुती स्थापन झाल्यापासून मावळ लोकसभेवरून तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी अगोदरच उमेदवारीवर दावा सांगितल्यानंतर इतर नेते सावध झालेत. बाळा भेगडे यांनी भाजपसाठी आग्रह धरला तर दुसऱ्या बाजूला आमदार सुनील शेळके, आमदार अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे मावळची जागा आणण्यासाठी अटोकात प्रयत्न केलेत. मात्र यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान करत मावळ लोकसभेबाबत एका वाक्यात विषय संपवून टाकला आहे.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काल जाहीर प्रवेश केला.यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असे घोषित केले. तर मावळची जागा ही शिवसेना शिंदे गटाकडे जाईल, असे सुतोवाच अजित पवारांनी केले. मंचर येथे पार पडलेल्या जाहीर सभेत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीसह रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे उमेदवार असतील असेही अजित पवारांनी घोषित केले.
दरम्यान, अजित पवार म्हणाले की, मावळ लोकसभेवर युतीतील तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्याने तेथील त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, तेथे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे तिकीट जवळपास निश्चित आहे. फक्त त्यांच्या नावाची घोषणाच काय ती बाकी आहे. २८ तारखेला ती होणार आहे. ते मावळात तर बारामतीत राष्ट्रवादी लढेल,असे अजितदादांनी सोमवारी मंचरला सूचित केले. याठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांनी मावळ आणि बारामतीतील आपल्या नातेवाईकांना धनुष्यबाण आणि घड्याळाचे बटण दाबण्याचे आवाहन केले. त्यातून मावळची जागा शिवसेनेला,तर बारामती राष्ट्रवादीला सुटणार हे स्पष्ट झाले.