नवी दिल्ली : देशात दिवसाला सापडणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या तब्ब्ल २ लाखांच्याही वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य सोयी-सुविधांचा तुटवडा जाणवत असून, परिणामी करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी रेमेडीसीवर इंजेक्शन्सचा, रुग्णवाहिकांचा, ऑक्सिजन सिलेंडर आणि बेड्सचा अभाव असल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसून येत आहेत.
दरम्यान, एकीकडे अशी विदारक परिस्थिती असताना, दुसरीकडे मात्र उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली असून, अनेक सवाल त्यांनी सरकारला विचारले आहेत. तसेच देशाची सामान्य जनता देखील यावरून समाज माध्यामांवर संतप्तपणे व्यक्त होत असून, देशात हा एवढा मोठा विरोधाभास असूनही या लाखो भाविकांवर कारवाई का नाही, असा प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जात आहे.
यातच आता कुंभमेळ्यात झालेल्या लाखो भाविकांच्या गर्दीमुळे सहाजिकच हजारो जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. अनेक साधु-संतांसह भाविकांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. काही आखाड्यांनी कुंभमेळ्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला आहे. तर कुंभमेळ्यामुळे निर्माण झालेल्या संसर्गाच्या संकटाची गंभीर दखल घेत पंतप्रधान मोदींनीही, आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून, करोनाच्या वाढत्या संकटामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक रूपातच साजरा करावा, असे आवाहन केल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.
आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरि जी से आज फोन पर बात की। सभी संतों के स्वास्थ्य का हाल जाना। सभी संतगण प्रशासन को हर प्रकार का सहयोग कर रहे हैं। मैंने इसके लिए संत जगत का आभार व्यक्त किया।
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2021
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाबाबत प्रतिक्रिया देताना महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांनी, माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. स्वत:च्या आणि इतरांच्या जीविताचे रक्षण करणे हे महापुण्याचे काम आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन धर्मपरायण जनतेने नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
मैंने प्रार्थना की है कि दो शाही स्नान हो चुके हैं और अब कुंभ को कोरोना के संकट के चलते प्रतीकात्मक ही रखा जाए। इससे इस संकट से लड़ाई को एक ताकत मिलेगी। @AvdheshanandG
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2021
देशात महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांची करोना परिस्थिती अतिशय बिकट आहे. या राज्यांमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या फैलावामुळे सध्या देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री आठ वाजता जनतेला फेसबुक लाईव्हद्वारे संबोधित करताना बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून १५ दिवसांच्या कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. तसेच देशपातळीवर देखील लॉकडाऊन होण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे.