पंढरपूर: राज्यात कोरोने थैमान घातलेले असताना यावर्षी सरकारकडून आषाढी वारीसाठी काही निर्बंधसह परवागी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून १० मानाच्या पालख्याना एसटी बसणे जाण्यासाठी मुभा दिली आहे. त्याबाबतचा आदेश आज राज्य सरकारनं काढलाय. त्यानुसार मानाच्या १० पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तसेच गेल्या वर्षीपेक्षा यंदा राज्यात आणि विशेषतः सोलापूर जिह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडत असल्याने आषाढी यात्रेला १७ ते २५ जुलै या काळात पंढरपूर शहर आणि परिसरातील १० गावांत संचारबंदीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
या काळात सोलापूर जिल्हा सीमा, पंढरपूर तालुका सीमा आणि पंढरपूर शहर सीमा अशा तीन ठिकाणी तिहेरी नाकाबंदी करण्यात येणार असून, परवानगी दिलेल्या भाविकांशिवाय कोणालाही आषाढीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. काही भाविक जर पंढरपूरकडे आले, तर त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठविले जाणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले. आषाढी यात्राकाळात चंद्रभागास्नानासाठी भाविकांनी येऊ नये म्हणून चंद्रभागा परिसरात १४४ कलम जारी केले जाणार आहे.
ज्या भाविकांना शासनाने परवानगी दिली आहे, अशा भाविकांना पासेस देऊन त्यांनाच नगरप्रदक्षिणा आणि विठ्ठल मंदिरात सोडण्यात येणार आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील नागरिकांनाही बाहेर पडता येणार नसल्याचे सातपुते यांनी सांगितले. सध्या सोलापूर जिह्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे, असे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.