नवी दिल्लीः कृषी कायद्याच्या मुद्यावर कॉंग्रेस केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली-पंजाबसह अनेक राज्यात काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात येत आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांनी आवाज उठवल्याने हिंदुस्थानला स्वतंत्र्य मिळाले आणि आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळेल, असं राहुल गांधी म्हणाले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या चर्चेचा एक व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर वेगळ्या व्यासपीठावर जाहीर करण्यात येणार आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. एल. पुनिया यांनी ट्विट करून या चर्चेचा छोटासा भाग जाहीर केला आहे. एमएसपी संपुष्टात येईल का? असा प्रश्न यामध्ये राहुल गांधींनी शेतकऱ्यांना केला. कृषी कायद्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असेल तर मग सरकार एमएसपीसाठी कायदा का करत नाही. अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींचा कृषी कायद्याचा फायदा होणार आहे, असं शेतकरी म्हणाले.
ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार होता, तसाच कारभार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. जर आज महात्मा गांधी जिवंत असते तर त्यांनी या कायद्याला विरोध केला असता, असं एका शेतकऱ्याने सांगितलं. शेतकर्याच्या आवाजाने हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि आज पुन्हा एकदा हिंदुस्थान शेतकऱ्याच्या आवाजाने स्वतंत्र होईल, असं राहुल गांधी त्यावर म्हणाले.
आमच्या थाळीत अन्न देण्यास शेतकरी विसरत नाहीत. मग त्यांना आपण कसं विसरू शकतो. त्यांनी आपल्यासाठी अन्न वाढवावं आणि आपण त्यांच्यासाठी आवाज उठवू नये? राहुल गांधींच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सकाळी दहा वाजता अन्नदात्याचा हा आवाज ऐका, असं ट्विट पी. एल. पुनिया यांनी केलं आहे.