राजस्थानातील राजकारण रंगात आले असताना मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सचिन पायलट यांना टोला लगावला. चांगले इंग्रजी बोलणे आणि हँडसम दिसणे पुरेसे नाही, आपली विचारधारा आणि वचनबद्धता पाहिली जाते, असा टोला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी निलंबित उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना अप्रत्यक्षपणे लगावला.
“जयपूरमध्ये घोडेबाजार होत होता, याचा पुरावा आमच्याकडे आहे. आम्हाला आमदारांना 10 दिवसांसाठी हॉटेलमध्ये ठेवावे लागले, जर आपण ते केले नसते तर मानेसरमध्ये (हरियाणा) जी गोष्ट घडली, तीच परत घडली असती” असा दावा गहलोत यांनी केला.
“मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे, आम्हालाही नवीन पिढी आवडते, भविष्य त्यांचेच आहे. हे नवीन पिढीचे नेते, ते केंद्रीय मंत्री झाले, प्रदेशाध्यक्ष झाले आहेत, आमच्या काळात आम्ही काय-काय केले हे ठाऊक असते, तर त्यांना नीट समजले असते.” अशी चपराकही त्यांनी लगावली.
“सफाईदार इंग्रजी बोलणे, माध्यमांना चांगले बाइट देणे आणि देखणे असणे हे सर्व काही नाही. देशाबद्दल आपल्या मनात काय आहे, आपली विचारधारा, धोरणे आणि वचनबद्धता, हे सर्व काही विचारात घेतले जाते” असे गहलोत यांनी सुनावले.