मुंबई – कोरोना विरुद्धच्या लसीकरण मोहिमेला मुंबईसह राज्यात मोठी खीळ बसली असून मुंबईत काल दिवसभरात केवळ १३ लोकांना व राज्यभरात केवळ १८१ लोकांनाच कोरोन लस देण्यात आली आहे.
राज्यात ९.८३ लाख लसी उपलब्ध असताना सुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी लस कमी देण्यात आल्याची रड केली जात आहे. केंद्राकडे बोट दाखविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळेच राज्यात लसीकरण मोहीम सपशेल अपयशी ठरली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,” अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य व अजब-गजब कारभारामुळे महाराष्ट्र देशाचा कोरोना कॅपिटल बनला आहे. कोरोना संसर्ग व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत दुर्दैवाने आजही महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य असून, राज्याचा मृत्यदर आज ही २.५४ टक्के इतका आहे.
तसेच मागील महिन्याभरात देशातील कोरोना रुग्णांचा दर झपाट्याने कमी होत असला तरीही आजसुद्धा देशातील एकूण रुग्णांपैकी ४२ टक्के रुग्ण हे केवळ महाराष्ट्र व केरळ या दोनच राज्यातील असून मृत्यूदराच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र देशात क्रमांक एक असल्यामुळे राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम अधिक गांभीर्याने घेऊन जलद व नियोजनबद्ध लसीकरण मोहीम राबविण्याची आवश्यकता होती. परंतु तसे न करता केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचेच काम राज्याकडून करण्यात येत आहे,” असं भातखळकर म्हणाले.