दुधाला मार्च महिन्यापासून जून महिन्यापर्यंत सर्वोच्च दर मिळतो आणि दूध उत्पादकांना हा काळ सुगीचा ठरतो. परंतु, याच काळात देशभरात कडक “लॉकडाऊन’चे निर्बंध असल्यामुळे अत्यंत कमी भाव मिळाला. परंतु, उत्पादित झालेल्या दुधाचे करायचे काय? हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला होता.
केवळ उसाच्या दरावरून संघर्ष करणाऱ्या या शेतकरी नेत्यांना आता दुधाच्या दराचा प्रश्न कळीचा वाटू लागला. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अग्रेसर असलेल्या राजू शेट्टी यांनी दुधाचा प्रश्न हाती घेतल्यानंतर तातडीने रयत संघटनेच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांनीही आंदोलनात उतरण्याचा आणि आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याचा विडा उचलला आहे.
उसाला हमी भावापेक्षा अधिक दर मिळावा यासाठी दहा वर्षांपूर्वी संघर्ष करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आता दुधाच्या दरावरून स्वतंत्र आंदोलन छेडणार आहेत. या गुरू-शिष्याच्या नात्यात गेल्या पाच वर्षांत कडवा संघर्ष निर्माण झाल्यानंतर हे दोन नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतंत्र आंदोलन छेडणार असल्याने दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खरे नेते कोण? हे निश्चित होणार आहे.
दुध दरात अचानक घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दुधाला अनुदान देण्याच्या मागणीवरून राजू शेट्टी यांनी सर्वप्रथम आवाज उठवला. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनीही तातडीने या आंदोलनात उडी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या भावनांना हात घालणारा हा मुद्दा असल्याने हे दोन्ही नेते पूर्ण ताकदीने या आंदोलनात उतरले आहेत. अनुदान कोण मिळवून देतो. त्यावरच दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते कोण याचे भवितव्य ठरणार आहे.