पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. मागील काही दिवसांपासून कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्यांकडून सातत्याने उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचे नाव घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता 22 डिसेंबरला राजू शेट्टी मुंबईत मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
मोदी सरकारचे कृषी कायदे हे अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. मुकेश अंबानी यांची भूक वाढली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके लादली जात असल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले. ते पुण्यात बोलत होते.
वांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या ऑफिसपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी ज्या कायद्यांची मागणीच केली नाही ते कायदे शेतकऱ्यांवर लादण्यात आले. सरकारला शेतकऱ्यांना काही द्यायचंच असेल तर हमीभाव द्या, असे राजू शेट्टी म्हणाले.
या मोर्चात बच्चू कडू आणि बाबा आढाव यांच्या संघटनांही सहभागी होणार असून, प्रकाश आंबेडकर यांनीही मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.