नवी दिल्ली : बिहारमधील सत्तारुढ जेडीयू आणि भाजपने सुरुवातीला सुशांतचा मुद्दा तेथील राजकारणात उचलला. सुशांतला हा मूळचा बिहारचा असल्याने त्याला बिहारचा मुलगा असे संबोधण्यात आले. बिहारच्या मुलाला न्याय मिळायलाच हवा, अशा घोषणा देत जनभावनेला हात घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. बिहारमधील प्रचाराच्या रणधुमाळीत सध्या सगळीकडे सुशांतचे बॅनर आणि मास्क यामुळेच दिसत आहेत.
राज्यसभेत कृषी विद्याकावरून झालेल्या गदारोळामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र या गोंधळामुळे उपसभापती हरिवंश हे चर्चेत आले आहेत. हरिवंश हे बिहारचे असून, ते जेडीयूचे आहेत. साहजिकच त्यांचा अपमान झाल्याची ओरड जेडीयूकडून सुरू करण्यात आली. बिहारच्या पुत्राचा अपमान झाला असून, तो सहन केला जाणार नाही, अशा गर्जनाही करण्यात येत आहेत. यात भाजपही मागे राहिला नाही. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कृषी विधेयकांवरुन झालेल्या गोंधळाचे राजकारण करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वत: सुशांत प्रकरणी लक्ष घातले होते. बिहारमध्ये नोव्हेंबरच्या सुमारास विधानसभा निवडणुका होत आहेत. कोरोना प्रार्दुभावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनने बिहारमधील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ गावी पोचले आहेत. त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न सरकारमोर आहे. याचवेळी राज्यात पुराने थैमान घातले होते. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मदत आणि पुनर्वसनाच्या पातळीवर सरकार अपयशी ठरले आहे. यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सरकार नवनवीन मुद्दे शोधत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात सुशांत पाठोपाठ हरिवंश यांचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
Read Also :