जळगाव – भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ मनगटावर बांधलं. मात्र, त्यांचीच सून असलेल्या रक्षा खडसेंनी हातातलं कमळ काही सोडलेलं नाही. आणि त्यामुळंच आता मुक्ताईनगरमध्ये सासरे विरुद्ध सून अशी परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. आणि याला ग्रामपंचायत निवडणुका कारणीभूत ठरु शकतात.
मुक्ताईनगरमध्ये 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. आणि यामध्ये ग्रामपंचायती जिंकण्याची जबाबदारी भाजपकडून रक्षा खडसेंवर असेल, तर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी एकत्र लढली तर ती जबाबदारी एकनाथ खडसेंवरच येणार आहे. त्यामुळंच या निवडणुकीत चुरस वाढली आहे.
एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात होत्या. चंद्रकांत पाटलांच्या रुपानं शिवसेनेचा कडवा विरोध एकनाथ खडसेंना होता. मात्र, आता खडसेच राष्ट्रवादीत आल्यानं आणि महाविकास आघाडीची सत्ता राज्यात असल्यानं हा विरोधही कमी झाला आहे. त्यामुळं मुक्ताईनगरमध्ये भाजप कमकुवत झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.