गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीतील शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला वेगळे महत्त्व आले आहे. आजवर येथील शहरप्रमुख पदाला फारसे महत्त्व नव्हते. पण, माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे पक्षाने पुन्हा एकदा शहराची जबाबदारी सोपवली. त्यानंतर काही महिन्यांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले व उपराजधानीतील शिवसेना शहर प्रमुख पदाला महत्त्व प्राप्त झाले.
तिकडे पंधरा वष्रे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे सतीश चतुर्वेदी हेही अचानक पक्षाबाहेर फेकले गेले. काँग्रेसमध्ये त्यांचे पुनर्वसन होण्याची चिन्हे नसताना व राजकारणाच्या पटलावरून चतुर्वेदी कुटुंबीयांचे नाव पुसले जाईल, अशी अवस्था असताना त्यांच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला. यवतमाळमधून विधानपरिषद निवडणूक लढवली व पुन्हा एकदा चतुर्वेदी कुटुंबातील सदस्य विधिमंडळाच्या वरच्या सभागृहात पोहाचला. या निवडणुकीमुळे चतुर्वेदी घराण्याला नवसंजीवनी मिळाली.
आता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघाचे आरक्षण काढले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. ही चर्चा कानावर पोहोचताच सतीश चतुर्वेदींच्या आतमधील राजकारणी जागा झाला व मुलाच्या माध्यमातून शहरातील शिवसेनेला अस्थिर करण्याचा डाव आखला गेल्याची चर्चा आहे. शहर शिवसेनेची धुरा चतुर्वेदी कुटुंबीयांच्या हाती आल्यास २०२४ मध्ये रामटेकसाठी ते दावा करतील, असेही शिवसेनेच्या गोटात बोलले जात आहे.