सध्याच्या काळात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याचा विषय मागे पडला आणि रिपब्लिकन पक्षाला फारसे भवितव्य राहिलेले नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना रामदास आठवले म्हणाले की, आता कार्यकर्तेही इतर पक्षांमध्ये जाऊ लागले आहेत, त्यामुळे यापुढे एकाकी लढण्यापेक्षा मोठय़ा पक्षाशी युती करूनच सत्तेचे राजकारण करावे लागेल.
गटबाजीमुळे पक्षाला आता भवितव्य उरलेले नाही, अशी खंत व्यक्त करत ते म्हणाले की, आठ वर्षांपासून राज्यसभेचे खासदार, दुसऱ्यांदा केंद्रात मंत्री होण्याची संधी, इतक्या प्रदीर्घ काळ सत्तेचे राजकारण करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष वाढविता आला नाही.