कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच पक्षापेक्षा गटाच्या राजकारणालाच अधिक महत्त्व आहे . पूर्वीपासूनच गटा – तटाच्या राजकारणाभोवती येथील राजकारण फिरत राहिले. सहकार , गट – तट आणि त्यातून राजकारण असे सर्वसाधारण सूत्र राहिले. पूर्वीपासून पाहिले तर रत्नाप्पाअण्णा कुंभार – आवाडे, माने – आवाडे, मंडलिक – यड्रावकर, आवाडे- आवळे, मंडलिक- मुश्रीफ, कोरे पाटील अशांमध्ये गटांमध्ये चालणारे राजकारण जिल्ह्याने पाहिले आहे. काळानुसार यामध्ये नंतर बदल होत गेले. सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील आणि महाडिक हे दोन गट कट्टर राजकीय शत्रुत्व असलेले आहेत.
नुकतीच कोल्हापुरात जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची निवडणूक पार पडली आणि कोल्हापुरातील सर्व राजकीय समीकरणे बदलून गेली. गेल्या ३० वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या महाडिक गटाचा यावेळी गोकुळच्या रणांगणात पराभव झाला. एकेकाळचे कट्टर मित्र असणारे माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे कट्टर शत्रू म्हणून गोकुळ च्या रणांगणात उतरले होते. सतेज पाटील यांना मंत्रिपद दिल्या गेल्यानंतर कोल्हापुरातील सर्व राजकीय समीकरणे त्यांनी बदलून टाकली.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक Kolhapur District Milk Producers Association – Gokul जागतिक महामारीच्या संकटकाळात जाहीर झाली आहे. बंटी पाटील आणि महाडिक घराणे पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर ठाकले गेले. महादेवराव महाडिक, अरुण नरके आणि आमदार पी.एन.पाटील यांनी गोकुळचा दूध संघ खूप वर्षांपासून त्यांच्या ताब्यात ठेवला होता. कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघ विरोधकांच्या तावडीत जाऊ द्यायचा नाही असे त्यांनी ठरवले होते. गोकुळ ची निवडणूक जाहीर होताच या तीनही सत्ताधारी मातब्बरांनी पायाला भिंगरी लावली गोकुळच्या रणांगणात सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचा पॅनल तयार करत विरोधकांच्या समोर दंड थोपटले आणि युद्ध गर्जना केली.
गोकुळच्या सत्ता केंद्रावर नजर लावून बसलेले बंटी पाटील हे सर्व पाहत होते. पडद्याच्या मागे मात्र बंटी पाटलांची यंत्रणा मात्र जोरात चालू होती. त्यांनी अनेक वर्ष गोकुळच्या महाडिकांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना म्हणावे तितके यश मात्र येत नव्हते. यावेळी मात्र ते सत्ता पालट करणार अशी संपूर्ण कोल्हापुरात चर्चा रंगली होती. यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये बंटी पाटलांनी महाडिक घराण्यातील प्रत्येकाला धूळ चारली होती. खासदारकीच्या वेळेस ‘आमचं ठरलंय’ म्हणत पहिले त्यांनी धनंजय महाडिक यांना घरी बसवले. नंतर विधानसभेच्या निवडणुकीत अमल महाडिक यांच्यावर गुरु डाव टाकत ऋतुराज पाटील यांना विधानसभेत धाडले. आता फक्त गोकुळ बाकी राहिले होते.
गोकुळवर लक्ष ठेऊन असलेल्या बंटी पाटलांनी महाडिक विरोधकांची मोट बांधली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश अबिटकर, माजी आमदार सूचित मिणचेकर, राज्यमंत्री यड्रावकर यांना एकत्र करत त्यांनी देखील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या पॅनलची निर्मिती केली आणि सत्ताधाऱ्यांना चिंता करायला लावणारा पॅनल गोकुळच्या निवडणुकीत उतरवला. गोकुळ ला कोल्हापुरात विशेष महत्व आहे. ज्यांची गोकुळवर सत्ता त्यांचीच कोल्हापूरच्या राजकारणावर पकड अशी समीकरणे कोल्हापुरात आहेत. अमूल दूध नंतर सर्वात मोठा दूध संघ म्हणून गोकुळ चे नाव आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा दूध संघ म्हणून गोकुळ दूध संघाचे नाव आहे.
गोकुळचे रणशिंग फुकले गेले आणि सत्ताधारी आणि विरोधी गटात टक्कर होण्यास सुरुवात झाली. दोन हत्तीच्या टक्करा होतात तस पाटील घराणं आणि महाडिक घराणं गोकुळच्या रणांगणात टक्कर घेऊ लागलं. दोन्ही बाजूनी जोरदार प्रचार सुरु झाला. गोकुळला आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळले असे महाडिक यांनी म्हटले. जेष्ठ संचालक अरुण नरके यांनी गोकुळ चा कारभार आम्ही खूप पारदर्शक केला आणि शेतकरी सभासदांना योग्य दर नेहमीच दिला असे देखील ते म्हटले.
बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गोकुळला मल्टीस्टेट करून महाडिक आणि सत्ताधारी गट गोकुळ स्वतःच्या घश्यात घालणार असा प्रचार सुरु केला. प्रचार सुरु असतानाच दोन्ही गटांनी आपले ठरवधारक सहलीला पाठवले होते हे विशेष. गोकुळची मुद्द्याची लढाई नंतर मात्र आली कट्टर वैऱ्यांवर. बंटी पाटील आणि महाडिक यांच्यात खटके उडाले आणि टीकांचा भडीमार सुरु झाला.” महाडिकांची सत्ता घालवण्याची हीच योग्य वेळ आहे ” असे म्हणत बंटी पाटलांनी पहिला तोफेचा गोळा महाडिक यांच्यावर टाकला आणि त्यानंतर मात्र हे युद्ध आणखी पेटले.
मी आता शांत आहे मात्र योग्य वेळी भर चौकात उत्तर देणार, मी या सगळ्यांचा बाप आहे ” असे म्हणत महादेवराव महाडिक गरजले. “तुम्ही कोल्हापूरचा आणि जिल्हातील सर्व लोकांचा अपमान केला आहे” असे म्हणुन हसन मुश्रीफ यांनी टोला मारला. “तुम्ही बाप नाही तर सगळ्या जिल्ह्याचा ताप आहेत ” असे म्हणत खासदार संजय मंडलिक यांनी टीका केली. दोन्ही बाजुंनी टीका टिपणी चालू असताना ठरावधारक मात्र ठिकठिकाणी हॉटेल्स मध्ये मज्जा मारत होते आणि आनंद लुटत होते.
हळूहळू गोकुळचे मतदान जवळ येऊ लागले. “पालमंत्री बंटी पाटलांना एवढी कसली मस्ती चढली आहे” असे म्हणत माजी जिल्हापरिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी टीका केली. बंटी पाटलांनी मात्र सर्व लक्ष जास्तीत जास्त कसे मतदान आपल्या पारड्यात टाकतील याचा प्रयत्न चालू केला. त्यातच राजू शेट्टी यांनी महाडिक यांना पाठींबा दर्शवत गोकुळ मध्ये मोठी राजकीय घडामोड घडून आणली. आता सर्व सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये कोण निवडून येणार,कोणाचे पारडे जड राहणार यावर खलबते सुरु झाली.
“त्यातच माझ्या कडे ४०० जास्त ठरवधारक आहेत आणि आमचा विजय निश्चित आहे” असे म्हणत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी निवडणुकीत खळबळ माजून दिली. त्यातच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. “तुमच्या ४०० च काय घेऊन बसलाय १००० जास्त ठरवधारक आमच्याकडे आहेत आणि गोकुळवर आमचाच झेंडा फडकणार “अशी सिंह गर्जना केली. दोन्ही बाजुंनी थेट ठरवधारकांचे आकडे सांगतिल्यामुळे सगळ्यांमध्ये आता संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
शेवटी मतदानाचा दिवस उजडला आणि मतदानाला कोण कसे शक्ती प्रदर्शन करते या कडे सर्वांचे लक्ष लागले. महाडिक गटाने शांततेने मतदान केंद्रावर एन्ट्री मारली आणि मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. दुसरीकडे मतदान सुरु झाल्यानंतर बंटी पाटील यांची जोरदार एंर्टी झाली. तब्ब्ल ५०० च्या वर ठरवधारक एकाच वेळी आणून बंटी पाटलांनी निवडणूक केंद्र गजबजून टाकले आणि विजयाची हमी देणारे चित्र तिथे उपस्थित केले. सर्वांना त्याच वेळेस चाहूल लागली होती की या वर्षी गोकुळचे सत्तांतर अटळ आहे.
शेवटच्या फेरीच्या मतमोजणीनंतर तब्ब्ल तब्ब्ल १७ जागांवर विरोधी गट म्हणजेच पाटील-मुश्रीफ गटाने विजय मिळवत गोकुळची सत्ता खेचून आणली आहे. खुल्या प्रवर्गात तब्ब्ल १३ जागांवर पाटील-मुश्रीफ गटाने विजय मिळवलेला आहे तर ३ जागांवर सत्ताधारी गटाने विजय मिळवला आहे. तब्ब्ल २५ वर्षांची पाटील-महाडिक गटाची निर्विवाद सत्ता उधळून लावण्यात पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाला यश मिळाले आहे. पुढील काळात महाडिक गटाची काय भूमिका राहणार याची सगळ्यांना औत्सुक्य राहणार आहे. Latest News on Kolhapur Gokul Milk