मुंबई : काही दिवसांपुर्वीच महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला आहे. त्यानुसार आता सरकारी कार्यालयातून जीन्स आणि टी-शर्ट हद्दपार झाले आहेत. सार्वजनिक आयुष्यात वावरत असताना सरकारी कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलावा ही भावना सरकारची आहे.
हा मुद्दा चर्चेत असतानाच आता केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे. मंत्र्यांसाठी देखील हा नियम लागू केला तर मला मंत्रालयात कसे येता येईल ? असा सवाल रामदास आठवलेंनी विचारला आहे.
राज्यसरकार ने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? pic.twitter.com/yS7jM7G8Xw
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) December 13, 2020
रामदास आठवलेंनी ट्विट केले की, राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबेरंगी आणि नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई करण्यात आली आहे. अशी मनाई जर मंत्र्यांनाही लागू केल्यास मला मंत्रालयात कसे येता येईल?
दरम्यान, शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांनी गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे परिधान करु नयेत, तसेच जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लिपर्स घालण्यास मनाई करण्यात आली आहे.