मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आरटीओमधील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी नाशिकमध्ये कोणताच गुन्हा घडला नसल्याचं पोलीस चौकशीतून निष्पन्न झालं आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी १५ मे २०२१ रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्यामध्ये त्यांनी आरटीओ विभागातील बदल्या, अधिकाऱ्यांच्या कामकाजातील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार या संदर्भात तक्रार केली होती. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते.
हे पण वाचा: भाजपाला दे धक्का; महापौरांसह तब्बल ३९ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत?
हे पण वाचा: ओबीसींचे राजकीय आरक्षण न मिळाल्यास निवडणुका होऊ देणार नाही; राम शिंदे म्हणतात…
निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारिनंतर पोलिसांनी कथित आरटीओ भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरु केली होती. या चौकशीत पोलिसांना भ्रष्टाचार झाल्याचं आढळलं नाही. त्यामुळे वरिष्ट अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांनाही क्लिन चीट देण्यात आली आहे. नाशिकमध्ये अशा प्रकारचा कोणताच गुन्हा घडला नाही, असं पोलीस चौकशीतून स्पष्ट झालं आहे. नाशिक क्राईम ब्रँचच्या माध्यमातून ही चौकशी सुरु होती. तक्रारदारसह, वरिष्ठ अधिकारी आणि इतर अशा 30 हुन अधिकांचे जबाब याप्रकरणी नोंदवण्यात आले होते.
हे पण वाचा: शिवसेनेचा भाजपला दे धक्का; दहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश
निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु, त्यांची तक्रार ही केवळ नाशिकपुरतीच मर्यादित नसून ही संपूर्ण राज्यातील आरटीओच्या इतर विभागांमध्येही अशाच स्वरुपाचे गैरव्यवहार झालेत, अशी त्यांची तक्रार होती. नाशिकमध्ये असा गुन्हा घडला नाही, परंतु, राज्यांतील इतर आरटीओ विभागांत काय घडलं आहे? याचा संपूर्ण अहवाल नाशिक पोलिसांनी पोलीस महासंचालकांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे नाशकात क्लिन चीट मिळाली असली तरी राज्यांतील इतर विभागांत काय घडलंय हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु, तुर्तास तरी या प्रकरणी नाशकात काहीच घडलं नसल्यानं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.