मुंबई : देशात गेल्या दोन महिन्यांपासून चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश अश्या पाच ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांचा माहोल होता. या पार्श्वभूमीवर जवळजवळ ६६ दिवस मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलची दरवाढ केंद्र सरकारकडून करण्यात आली नव्हती.
मात्र, निवडणुकांचे निकाल लागताच उन्हाच्या झळा बसतात, तसे महागाईचे चटकेदेखील बसायला सुरुवात झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली असून, सलग दोन दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होऊ लागली आहे.
या पार्शवभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी ट्विट करत, मोदीसाहेब, प.बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल – डिझेलवर का काढताय? असा सवाल केला आहे. तसेच, “दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या, तर किती बरं झालं असतं, काही नाही निदान पेट्रोल – डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते,” असा टोला देखील रुपालीताई चाकणकर यांनी लगावला आहे.
दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं…. काही नाही निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते.
पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ!!
" सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?? https://t.co/27VYoKIpMj— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 7, 2021