मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करत भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांना फटकारले आहे.
कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत लसीचा ठणठणाट आहे व पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान सोडले. पंतप्रधानांचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे. राजकीय भांडणे आहेत, पण त्या भांडणात आपल्याच लोकांचे जीव का घ्यायचे? महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेने कधीतरी आजच्या विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलेच होते. तेवढे तरी इमान राखा. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल, असा जोरदार शाब्दिक हल्ला सामना अग्रलेखातून चढवण्यात आला आहे.
सामना अग्रलेखात म्हटले आहे की, माणसे सरणावर चढत आहेत व त्यांच्या मढ्यांवरून वादावादी सुरू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे असे कधीच घडले नव्हते. करोना हा मानवनिर्मित की दैवी कोप? यावर बरेच वाद झाले, पण सांगलीचे शिवभक्त अवलिया भिडे गुरुजी यांनी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. ‘जे ‘गांडू’ आहेत त्यांना कोरोना होणारच. कोरोनामुळे जे मरणार आहेत ती माणसे जगायच्याच लायकीची नाहीत,’ असा विचार सांगलीच्या या अवलियाने मांडल्यामुळे बहुधा लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी स्वतःचे उद्योग गुंडाळायला घेतले असतील, असे म्हणत संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर देखील भाष्य केले आहे.
महाराष्ट्रात कोरोनावरील लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला व यामागे महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. महाराष्ट्राची जनता म्हणजे टिनपाट किंवा गांडूची अवलाद असा समज केंद्राने अलीकडच्या काळात करून घेतला असेल तर ते भ्रमात आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत लसीचे राजकारण सुरू झाले ते निर्घृण आहे. भिडे यांनी कोरोनाग्रस्तांना गांडू म्हटले. त्याऐवजी लसीचे राजकारण करणाऱ्यांना या ‘गांडुगिरी’चा फटका मारला असता तर शिवरायांचे नाव राहिले असते, असेही अग्रलेखात म्हटले आहे.
शिवसेनेने अग्रलेखातून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि डॉ. हर्षवर्धन यांच्यावर देखील टीकेची तोफ डागली आहे. पुण्याचे प्रकाश जावडेकर हे दिल्लीत बसून महाराष्ट्राविरोधी बदनामी मोहिमेचे नेतृत्व करतात हे दर्दनाक आहे. कोरोना संकटाची लढाई पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. देशात कोविड लढाईच्या यशाचे श्रेय कालपर्यंत मोदीच घेत होते हे जावडेकर विसरलेले दिसतात. पंतप्रधानांनी कोविडसंदर्भात जे जे निर्णय घेतले त्याचीच अंमलबजावणी महाराष्ट्राने केली आहे. अर्थात, जावडेकर यांचा दोष नसून महाराष्ट्रद्वेष हा दिल्लीतील प्रत्येक राज्यकर्त्यांच्या रक्तातच ठासून भरलेला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी तर महाराष्ट्राची ‘लसी’च्या बाबतीत न्याय्य मागणी लाथाडण्याचाच प्रयत्न केला व आरोग्यविषयक गंभीर स्थितीत ‘वसुलीबाज’ वगैरे शब्द वापरून राजकारण किती ‘गांडू’ पद्धतीने सुरू आहे ते दाखवून दिले, अशी जोरदार टीका करण्यात आली आहे.