राजस्थानमध्ये बंडाचे निशाण फडकवून आपल्याच सरकारला आव्हान देणारे सचिन पायलट यांच्याबद्दल काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले आहे.उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.
पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्यात आलं आहे. तर त्यांच्या समर्थक आमदारांची मंत्रिपदं काढून घेण्यात आली आहेत. काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबद्दलची माहिती दिली. ‘पूर्ण बहुमतानं निवडून आलेले सरकार पाडण्यामागे भाजपाचे षडयंत्र आहे. सत्ता आणि पैशांचा वापर करून, ईडी आणि आयकर विभागाकडून दबाव आणून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपाने सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कारस्थानात पायलट अडकले आणि त्यांनी जनतेने निवडून दिलेल्या सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला,’ अशा शब्दांत सुरजेवाला यांनी पायलट आणि भाजपा यांचा समाचार घेतला.
गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या सत्ता संघर्षवरून राजकीय घडामोडींना वेग आला होता. सचिन पायलट यांनी सरकार विरोधात पुकारलेल्या बंडावरून राजस्थानचे राजकारण चांगलेच चर्चेत आले होते त्यातच पायलट भाजपात जाणार याबाबतच्या चर्चाहि रंगू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात पायलट भाजपात जाणार का याबाबतच्या चर्चांना वेग आले आहे .