जयपूर : राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकाल काँग्रेससाठी एक झटका आहे. या निकालामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे राजकीय वजन कमी होण्याची शक्यता आहे. हे निकाल गेहलोत यांचे राजकीय स्पर्धक सचिन पायलट गटासाठी थोडे फायद्याचे ठरु शकतात.
डिसेंबर किंवा पुढच्या महिन्यात राजस्थानातील महामंडळे आणि अन्य पदांवर नेमणुका होणार आहेत. त्यावेळी पायलट समर्थकांना महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागण्याची अपेक्षा आहे. पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. ग्रामीण भागात पकड असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेससाठी हा एक झटका आहे.
प्रदेश काँग्रेसच्या समित्यांवर तसेच राज्यातील अन्य पदांवर समान नियुक्त्या होतील असे राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी आधीच सांगितले आहे. सचिन पायलट गटाची या नियुक्त्यांवर नजर आहे. ज्यांनी पायलट यांच्याबरोबर जवळीक दाखवली त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नव्या नियुक्त्यांमध्ये विचार होईल अशी पायलट गटाला अपेक्षा आहे.
अनेक वर्षांपासून जे कार्यकर्ते मेहनत करतायत, त्यांना नियुक्त्त्यांमध्ये वाटा दिला पाहिजे असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे. भाजपाने पंचायत समितीच्या १८३५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला १७१८ जागा जिंकता आल्या आहेत. ४०५० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. २२२ पंचायत समित्यांमध्ये एकूण ४३७१ जागा आहेत. जिल्हा परिषदेतही अशीच स्थिती आहे. जिल्हा परिषदेत ५८० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपाने ३१२ तर काँग्रेसचे उमेदवार २३९ जागांवर विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेत एकूण ६३६ जागा आहेत.
Read Also :
‘मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?’, काँग्रेस नेत्याचं संतापजनक विधान
…तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं?,फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’
‘आता तुम्ही हिमालयात जाणार का?’ पत्रकरांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं मौन