मुंबई: गुंडगिरी करणाऱ्या भाजप आमदारांवर झालेल्या कारवाईचे आम्ही स्वागतच करत आहोत. केंद्रात आपले सकरार आहे म्हणून आम्ही काहीही करू शकतो असे म्हणत धक्काबुक्की करणे, धमक्या देणे , शिवीगाळ करणे याला माज म्हणतात. अशा शब्दात सचिन सावंत यांनी टीका केली आहे.
धिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. सत्ताधारी आणि विरोधक पहिल्याच दिवशी आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक भिडले आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधकांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला. विरोधकांनी मात्र, या आरोपाचं खंडण केलं आहे. अभूतपुर्व गोंधळामुळे अधिवेशनाचं कामकाज तीन वेळा दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
विधानसभेत गुंडगिरी करणाऱ्या भाजपा आमदारांवर झालेल्या कारवाईचे आम्ही स्वागतच करत आहोत. केंद्रात आपले सरकार आहे आणि आम्ही काहीही करू शकतो असे म्हणत धक्काबुक्की करणे, धमक्या देणे , शिवीगाळ करणे याला माज म्हणतात.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 5, 2021
ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी यावेळी सांगितलं. यावेळी विरोधकांचा जोरदार गदारोळ सुरु होता. कामकाज तहकूब झाल्यानंतर कुटे यांनी अध्यक्षांच्या केबिनमध्ये भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. कुटे यांनी तो आरोप फेटाळला आणि गर्दीमुळे धक्का लागल्याचा दावा केला. आम्हाला सभागृहात बोलू न दिल्याने आपण आक्रमक झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, मलिक यांनी अशा आमदारांवर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे, अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, नारायण तिलकचंद, पराग आळवणी, हरिष मारेती आप्पा पिंपळे, जयकुमार रावत, नारायण कुचे, गिरीश महाजन, राम सातपुते, योगेश, किर्तीकुमार भांगडीया यांसह बारा आमदाराचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.
भाजप ओबीसींची दिशाभूल करत असून ओबीसी मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की केली. ओबीसी मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा तोल सुटला असून भाजपला ओबीसींचा रोष असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. तर धक्काबुक्की करणाऱ्या भाजप आमदारांवर कारवाई करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत विधानसभेत जोरदार घोषणाबाजी झाली. या मुद्यावर बोलू न दिल्याच्या निषेधार्थ विरोधी भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. आमदार गिरीश महाजन , संजय कुटे यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर येऊन घोषणा दिल्या. आमदार कुटे यांनी अध्यक्षांसमोरचा माईक खेचण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे वारंवार कामकाज तहकूब करण्यात आलं.