मुंबई : राज्यातल्या करोना परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातही राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केले जात असून, शनिवारी ब्रूक्स फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा जाब विचारण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि काही नेते, हे विलेपार्लेच्या बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात गेले होते.
यावरून सध्या राज्यात जोरदार राजकारण सुरु आहे. एकीकडे सत्ताधारी पुरवठादारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप भाजपने केला आहे, तर भाजप नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
दुसरीकडे यावरूनच केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये देखील खडाजंगी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाही आहे, असा आरोप केला होता.
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र देखील त्यांनी थेट राज्यपाल कोश्यारींना लिहिले आहे.
करोनाच्या भीषण संकटात नवाब मलिक यांच्या या तथ्यहीन आरोपांमुळे अफवांना वाव मिळत असून, जनतेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. नवाब मलिक यांनी अजूनही या आरोपांच्या अनुषंगाने कोणताही पुरावा सादर करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या या अपराधाबद्दल राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून, महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जी यांनी मंत्री नवाब मलिक यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
नवाब मलिक यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा !
राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना कोणीही राजकारण करू नये, असे सल्ले देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच सरकारमधील मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांनी शनिवारी केंद्र सरकारवर अतिशय बेजबाबदार आणि तथ्यहीन आरोप केले. pic.twitter.com/92ANC5w6Ri
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 19, 2021
राज्यात करोनाने थैमान घातले असताना कोणीही राजकारण करू नये, असे सल्ले देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच सरकारमधील मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांनी शनिवारी केंद्र सरकारवर अतिशय बेजबाबदार आणि तथ्यहीन आरोप केले असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर बिनबुडाचे आरोप करत, केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.