मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर रखडलेला मंत्रीमंडळचा विस्तार तसेच कोरोना काळात सरकार अपयशी ठरल्याचा ठपका काही नेत्यांनी ठेवला आहे. त्यामुळं भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका होणार की नाही हे अजून तरी स्पषट झालेले नाही.
विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आधीच उत्तर प्रदेश भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा याचे दौरे होणार आहे. अनेक ठिकाणी विकासकामांचे उदघाटन प्रस्तावित आहे. त्याची तयारीही भाजपकडून सुरू करण्यात आली आहे.
मात्र, ही तयारी करत असताना भाजपला अंतर्गत धुसफूसही शांत करावी लागत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या विरोधकांना शांत केल्यानंतरही भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. केशव प्रसाद मौर्य आणि भाजपचे काही आमदार यांची अस्वस्थता वारंवार बाहेर येत आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांना गेल्या २० दिवसात दुसऱ्यांदा लखनऊ गाठावे लागले.
भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी राधामोहन सिंह, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, मोदींचे निकटवर्ती असलेले भाजप उपाध्यक्ष ए. के. सिंग आणि संघाचे नेते सुनील बंसल यांच्या उपस्थितीत संतोष यांच्याकडून भाजप आणि संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांबरोबर सातत्याने चर्चा सुरू आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला लखनऊहून परतल्यानंतर संतोष यांच्याबरोबर सरसंघचालक आणि सरकार्यवाह यांची दीर्घ चर्चाही झाली होती.