मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनी ट्वीट करत केंद्रावर टीका केली आहे
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईतील इंच इंच जमिनीवर राज्याचा अधिकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्राचे नाव हवे, मग त्या सातबाऱ्यावर दिल्लीचे नाव कसे? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
“मिठागारांना राज्य सरकारने जागा दिली आहे. त्यामुळे मेट्रोसंबंधी केंद्र आणि राज्य सरकार असा संघर्ष नाही. मुंबईतील इंच इंच जमिनीवर राज्याचा अधिकार आहे. महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्राचेच नाव हवे. मग महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर दिल्लीचे नाव कसे?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. “मुंबई मेट्रोच्या प्रकरणात केंद्राने का पडावे? महसूल रेकॉर्ड बघा, त्यावर महाराष्ट्राचीच मालकी आहे,” असेही संजय राऊतांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या सात बारा वर दिल्लीचे नाव कोणी लावले?
मुंबईची इंच इंच जमीन फकत महाराष्ट्राचीच. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया.
जय महाराष्ट्र!!— Sanjay Raut (@rautsanjay61) November 4, 2020