मुंबई : राज्यात करोना विषाणूच्या फैलावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येसोबतच, रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सोयी सुविधा, जसे की, ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन, यांचा पुरवठा अपुरा पडत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरु आहेच, पण राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात देखील यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यातच आज शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
‘देशात करोनाचे जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्याला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवाव्यात, अशी आमची मागणी आहे. पंतप्रधानांचं परवाचं भाषण ऐकलं, त्यांनी सांगितलं की, ऑक्सिजन, रेमडेसिवीर कमी पडणार नाही; मग महाराष्ट्राला यांचा पुरवठा का कमी होत आहे, ही टंचाई महाराष्ट्रात का निर्माण होतेय? पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात नसेलही, मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.
तसेच, पंतप्रधानांच्या लॉकडाऊन बाबतच्या भूमिकेशी फारकत घेत, पंतप्रधानांची लॉकडाऊन बाबतची भूमिका ही देशासंदर्भात असू शकते, पण त्यांनी प्रत्येक राज्यातील परिस्थितीनुसार निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा. राज्यात परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे आदेश आलेले आहेत. सरकारमधील काही मंत्र्यांनी देखील कडक निर्बंधांऐवजी लॉकडाऊन लावा, अशी मागणी केली आहे. मृत्यूची साखळी तोडायची असेल, तर लॉकडाऊनला पर्याय नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेनेचे सूत्र आहे, असे त्यांनी सांगितले.
रेमडेसिविर एकाच राजकीय पक्षाला मिळत आहेत, मात्र महाराष्ट्रासारख्या राज्याकडे रेमडेसिविरचा पुरवठा येत नाही, उलट महाराष्ट्रात हायकोर्टच राज्य सरकारला रेमडेसिविरवरून फटकारते ही बाब गंभीर आहे, असे सांगत त्यांनी, केंद्र सरकारकडून इकडून तिकडून पैसा गोळा करून तो बंगालमध्ये खर्च केला जातोय, त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारचे देणे असलेला पैसा लवकर द्यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.