मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच मुंबई पोलीस सक्षम असून तेच या प्रकरणाचा तपास करतील असंही नमूद केलं आहे.
संजय राऊत केलेल्या वक्तव्यांबद्दल त्यांना सुशांतच्या चुलतभावाने कायदेशीर नोटीस बजावली. राऊत यांनी आपण केलेल्या वक्तव्यांबद्दल येत्या ४८ तासांत माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या नोटिशीत म्हटले होते त्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “या प्रकरणाला न्याय मिळो. मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल. मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे. त्यांचं कुटुंब त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करतंय.”
“काय करायंचंय ते आम्ही आणि सुशांतचं कुटुंब पाहू. माध्यमांनी बोलायचं काही काम नाही. काही जण महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम करत आहेत. आगामी काळात हे कोण आहेत ते आम्ही सांगू,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.