मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटीची वसुली करण्याचे सांगितले होते. त्यांच्या या आरोपानंतर अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुखांवर सीबीआयचा फास आणखीनच घट्ट होत चालला आहे. सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात खंडणी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुखांच्या घरासह जवळपास १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणामुळे अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या सर्व घडामोडीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआय आपलं काम करत आहेत. सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टात येईल . तेव्हा काय करायचं ते पाहू , असं म्हणत संजय राऊत यांनी वेळ मारुन नेली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी चर्चा केली. सीबीआयचा एक अजेंडा आहे. कोर्टाचा आदेश आहे. कायद्यापेक्षा कोणीहि मोठा नाही हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त देणे योग्य होणार नाही. देशमुखांनी आपलं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू, असं राऊत म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारही आपलं काम अत्यंत चांगल्या रीतीने करत आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली. ज्या दिल्लीत राष्ट्रपतींचं निवासस्थान आहे, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार चालवतात. त्या ठिकाणी गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजन संपल्यामुळे कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. मुळे देशात अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवली आहे. देशात आरोग्यबाबत अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता हा नरक नाही तर काय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.