मुंबई : राज्यात करोनामुळे हाहाकार उडाला असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी व टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर, काल रात्री साडेआठ वाजता फेसबुक लाइव्हद्वारे, राज्यात बुधवार रात्री ८ वाजेपासून, १ मे २०२१ पर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसचं या कडक निर्बंधांचा आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून, दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेजही त्यांनी जाहीर केले आहे.
यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला टीकेचे लक्ष्य केले असून, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सरकारने जाहीर केलेली ३ हजार ३०० कोटींची तरतूद ही अर्थसंकल्पातील नियमित तरतूद आहे. त्यामुळे ही कोरोनासाठीची तरतूद नाहीच. त्यामुळे सरकारचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे,’ असे म्हणत सरकारवर हल्लबोल केला आहे.
मात्र, भाजपशासित राज्यांमध्येही करोनाचे संकट हाताबाहेर गेले असून, त्यामुळे करोनाचे व्यवस्थापन चांगले असल्याचा विरोधकांचा दावा खोटा ठरत असल्याची टीका, फेसबुक पोस्ट करत रोहित पवारांनी केली आहे.
मला विरोधकांनाही सांगायचंय की ही वेळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची नसून एकत्रितपणे संकटाचा मुकाबला करण्याची आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे…https://t.co/RgLbn5msEE pic.twitter.com/OH8w511qHR
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 14, 2021
तसेच त्यांनी केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीचा दाखल देत छत्तीसगढ, उ.प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार या राज्यांमध्ये देखील करोनाचं संकट भीषण असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, यापैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांचा, ‘भाजपशासित राज्यांमधील करोना व्यवस्थापन खूपच चांगलं असल्याने तिथं करोना येत नाही, हा दावा फोल ठरतो, हे लक्षात घ्यावं, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
यावेळी त्यांनी, ‘मला आजच्या परिस्थितीबाबत कोणाला दोष द्यायचा नाही. मला विरोधकांनाही एवढच सांगायचंय, की ही वेळ एकमेकांची उणी-दुणी काढण्याची नसून एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे. आमच्या विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे करोना हा केवळ एखाद्याच राज्यात वाढत नसून तो सगळीकडेच वाढतोय,’ असं म्हणत, भाजपचे नेते महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीवरुन राजकारण करणं थांबवत नाहीत, हे दुर्दैवी वाटतं अशी टीका केली आहे.